मागच्या वर्षी आपले बोलणे विसर्जनाच्यावेळी झाले होते. तुझी ती त्रासिक नजर आणि त्यात तू म्हटला होतास परिस्थिती बदलेल, मला सुद्धा वाटले होते पण तुझी चूक काढण्याइतपत मी मोठा नाही, तूच बघ काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात ते ! मध्यंतरी लोकमान्य भेटले होते. हो ! हो ! तेच, तू ओळख प्राप्त करून दिली होतीस तेच ! लोकलच्या प्रचंड गर्दीत त्यांना कोणीच ओळख दिली नव्हती, खूप संतापले होते. अगदी कर्जत येईपर्यंत आम्ही गप्पा मारल्या पण आजची परिस्थिती ऐकून ते शांतच होते. कर्जतला उतरल्यावर निरोप घेताना त्या महामानवाचा करारी आवाज घोगरा झाला होता आणि कणखर पावलेसुद्धा जड झाली होती. असो ! काळ बदलला आहे. तूर्तास एका वर्षात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेले आणि त्यात तुझे विचारसुद्धा !
सध्या इथे कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या जात आहेत त्याला कारण आहे, सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ? हास्यास्पद आहे रे, वाभाडे काढत आहेत स्वतःच्या उत्सवाचे.... कोणाला बोलणार आणि काय बोलणार ! ऐकून घ्यायची मनस्थिती इथे कोणाचीच नाही. बाकी तुझ्या कृपेने पाऊसपाणी ठीक आहे. जागोजागी आणि चौकाचौकात तुझ्या आगमनाचे बॅनर लागले आहेत. "मी येतोय" असं अगदी मोठ्या अक्षरात लिहिले आहे. "मी येतोय, बुद्धी वाटायला" असे लिहायचे बहुतेक राहून गेले आहे. असो ! नेहमीप्रमाणे रस्ते फुटलेले आहेतच. तुझे आगमन होणार म्हणून काही ठिकाणी ठिगळं लावली जात आहेत पण इतक्या वर्षात ठोस उपाययोजना अशी काही नाही. सत्तेतले विरोधात आणि विरोधक सत्तेत ! सर्व सारखेच आणि त्यांच्या दावणीला बांधलेले कार्यकर्ते म्हणजे आंधळ्यांची फौज रे ! राजकारण्यांच्या तुंबड्या कशा भरतील ? देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही पाणी, रस्ते आणि वीज ह्यावरच निवडणुका लढवत आहोत. असो ! तुला काय ? यावर मी अधिक बोललो तर हि अंध फौज माझ्यावर येईल. कोणी नाही रे, इथे शुभ्र ! चंद्र तरी कुठे शुभ्र आहे. तू जवळून पाहतोस आणि त्यात तुझी भ्रमंती वरती असते मी काय नवीन सांगणार ? इथे प्रत्येकाच्या चंद्राला कसला तरी डाग आहेच. मध्यंतरी काहीतरी एक बातमी आली आहे कि, मिरवणुकीत डिजेवर बंदी घातली आहे म्हणून.... जाम टेन्शनमध्ये आहेत भक्तमंडळी आणि काही ठिकाणी जुगारांवर धाडी पडायच्या शक्यता आहेत असे कोणीतरी कानोकानी सांगत फिरतंय. दिवसरात्र तुझ्या समोर बसणाऱ्या so called भक्तांना घाम फुटला आहे. माझ्या मते, तू मास्टर स्ट्रोक मारला आहेस, कायपण बोल मला आवडले. तुझ्या मंडपात हि लोकं सैराट मधली गाणी लावतात. मिरवणुकीत दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालतात. काय ते वल्गर नाचणं ! हे सर्व पाहून डोक्यात मुंग्या येतात. कोणाला रोखणार आणि कसे रोखणार ? विचारहीन लोकांना वैचारिक गोष्टी कळणार आहे का ? मिरवणुकीत हतबल होऊन मी तुझ्याकडे पाहत असतो पण तू नजर देत नाहीस. तुला वाटतं का, परिस्थिती बदलेल ? मला तरी नाही वाटत कारण काहीजण नाही सुधारतं. लपून छपून पैशांवर पत्ते खेळत असतात. काय कमाल आहे ना बुद्धीच्या देवा ? जागरणाच्या नावाखाली तुझ्या समोर जुगार खेळतात. त्यांचे आईवडीलसुद्धा काही बोलत नाहीत. माझ्या मते, त्या मुलांपेक्षा त्यांच्या पालकांना अक्कल दे कि, देवासमोर जुगार खेळू नये म्हणून ! लोकमान्यांनी तुझ्या उत्सवात सुरु केलेले हिंदू धर्मावरील आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्याने आज लुप्त झाली आहेत. लेझीम खेळणारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मर्दानी खेळ दाखवणारी मंडळी हरवली आहे. त्यांची आठवण शिवजयंतीलाच येते तेव्हा कुठे कुठे दिसत असतात. बाकी काय अजून ? काहीही बोल देवा ! पण तुझ्या उत्सवात सार्वजनिक मंडळं खूप श्रीमंत झाली आहेत. मंडळमंडळांमध्ये स्पर्धा लागली आहे गर्दीचे शक्तीप्रदर्शन दाखवायला ! मग पाद्यपूजन काय आणि मुखदर्शन काय....काय काय शोधतील त्यांचे त्यांना ठाऊक ! हजारो आणि लाखो लोक ह्या मंडळात तुला बघायला जातात पण त्यांना आपल्या नातेवाईकांकडे बसलेला तू नाही दिसतं. तुझी ती भव्य मूर्ती पहायला तुफान गर्दी उसळलेली असते पण गर्दीत माणुसकी हरवली आहे रे ! त्यात सुद्धा पैसे आकारून VIP रांग लागलेली असते आणि बाकी म्हणशील तर वशिलेबाजी करून तुझ्या समोर तुझे so called भक्त हात जोडतात, त्यांना तू पावतोस का रे ? कारण बाकी सर्वसामान्य लोक आठ ते वीस तास रांगेत उभे असतात. राजकीय पुढारी आणि सेलिब्रेटी मागच्या दाराने येतात आणि तिथूनच ते निघून जातात. तू मंडपातील गर्दीत असतोस तुला बाहेरची परिस्थिती कशी कळणार ?
तुझ्या दर्शनाला हल्ली विशेष अशी लोकं घरोघरी जात नाहीत. तसा विचार केला तर तू फक्त कारण आहेस, आपल्या मंडळींची लोकांनी मनापासून भेट घ्यावी ! आपल्या लोकांसाठी वेळ मिळावा, विचारपूस व्हावी, एकत्र जेवण करावे म्हणून हा सण एक निमित्त होते पण काळ बदलला रे, कोणीच एकत्र नाही. जितके भाऊ तितके गणपती झाले आहेत. धंदा तेजीत आहे गणपती कारखानावाल्यांचा ! तुझ्या आगमनासाठी बाजारपेठ फुलून गेली आहे पण वरून गरीब दाखवणारे हे दुकानदार खऱ्या गरिबांना लुटत आहेत. तुझ्या मानासाठी बिच्चारे पैसे खर्च करून स्वागत करत आहेत तुझे ! तू जोशात येतोस आणि आजूबाजूचे चित्र पाहून पाच-सहा दिवसांत त्वेशात निघून जातोस. परिस्थिती पुन्हा जैसे थे ! कधीतरी विचार कर आम्हांला सुखावण्याचा ! मनोमन प्रार्थना करणारे सच्चे भक्त आजही आस लावून आहेत. बघ ना यार ! तू माझ्यासारखा हतबल झाला आहेस का ? तसे असेल तर तू सांगून मोकळा हो ! पण अबोला धरु नको. सणांचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. शिकलेले लोकं जेव्हा ह्या परिस्थितीत अडकून पडतात तेव्हा काहीच सुचत नाही.
आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळसदृश स्थिती आहे. अरे हो ! सांगायचे राहिले ते शेतकरी आत्महत्या प्रकरण हा हा तेच ! वर्षानुवर्षे चालत आलेले आजही संपलेले नाही म्हणूनच बोललो कि, सत्तेत कोणी असो, सर्व सारखेच ! पण मी काय बोलतो देवा, तिकडे नैसर्गिक मृत्यू होतच नाहीत का ? भाबडा प्रश्न रे ! इथे असे कोणाला विचारले तर direct अंध फौज पाणउतारा करतात. मध्यंतरी संप पण झाला होता. असं कधी होत नाही पण अदृश्य शक्तीमुळे ते हि झाले होते. जातीभेदाचे स्तोम खूप माजले आहे रे ! देश स्वतंत्र झाल्यापासून कधी नाही ते आता आरक्षणासाठी मोर्चे निघत आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर पावित्र्य ठेवायलाच हवे ना ! तर तंबाखू मळत आणि तोबरा भरून घोषणा देत होते मी आक्षेप घेतला आणि बोललो त्यांना, तर त्यांचा प्रश्न होता "तू मराठा आहेस का ?" बघ ना देवा, मुद्दा पावित्र्य राखण्याचा होता आणि हे लोक माझी जात काढायला लागले. कठीण होत चालली आहे परिस्थिती ! तू नुसता येऊन जाऊन नको करू तू आम्हांला समाजव्यवस्था सुधारण्यासाठी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आशीर्वाद दे.
चल देवा ! तुझ्या सणाच्या तुला शुभेच्छा पण तू वरती केलेला हात नक्की कशासाठी हे मला आजपर्यंत न उमजलेलं कोडं आहे. कोणी आशिर्वादासाठी म्हणतो, आणि तुझ्या जवळचे फळ चोरून नेतो. जुगारडा माणूस तर direct पैसेच चोरून नेतो. तर कोणी हे असले प्रकार निदान आतातरी थांबावा म्हणून तुझा हात वर आहे, असे सांगतो. एकंदरीत मला वाटते कि,
तू हात उचलला होतास
पत्ते खेळू नका सांगायला
लोकं आशीर्वाद समजून बसली
त्यांच्या काळ्या कामाला !
© सागर मधुकर सुर्वे
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
No comments:
Post a Comment