ते वीर लढले होते.... कोणासाठी आणि कशासाठी ????

          दिनांक १५ ऑगस्ट १९४७ इंग्रजांच्या अत्याचाराच्या जोखडातून हिंदुस्थान स्वतंत्र झाला. व्यापारासाठी आलेली इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीने आपल्या देशाला गुलाम करून कधी देशाची मालक झाली हे कळलेच नाही. तब्बल १५० वर्ष आपल्यावर त्यांनी अनन्वित छळ करून राज्य केले.

          स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके असे कितीतरी ज्ञात-अज्ञात वीरांमुळे आणि त्यांनी भोगलेल्या यातनांमुळे आपला देश स्वतंत्र झाला. देश स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटला होता आणि आपले वीर समिधा होऊन त्यात आहुती देत होते. त्यांच्यावर झालेले भयावह अत्याचार आजही जो वाचेल त्याच्या डोळ्यांतून अश्रू आल्याशिवाय राहत नाही. D for Danger असा बिल्ला, ३२७७८ क्रमांक अडकवलेले आणि त्यावर २० ते २५ किलोग्रॅम वजनाचे साखळदंड २४ तास घातलेले आणि ऐन तारुण्यात असलेले आपले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर तब्बल दोन जन्मठेप भोगण्यासाठी अंदमानात दाखल झाले होते आणि भयावह असे अत्याचार त्यांनी व त्यांचे बंधू बाबाराव सावरकरांनी तिथे सहन केले, कोणासाठी तर देशासाठी ! आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यात देशाबद्दलचा अभिमानसुद्धा आलाच ! 

          आज काळ बदलला आहे. ह्या देशात "वंदे मातरम् बोलणार नाही" असे तोंड वर करून सांगितले जाते. देशाची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांवर इथे दगड मारले जातात. राष्ट्रीय एकात्मता आहे म्हणून टाहो फोडून सांगणारे इथलेच एक राज्य वेगळ्या झेंड्याची मागणी करत आहे. "भारतमाता, तेरे तुकडे होंगे हजार" असे म्हणणाऱ्या नालायकला इथे आपली नालायक राजकीय हस्ती भाषण करायला आमंत्रण देत आहेत. आपल्या तिरंग्याला कधीही सलाम न करणाऱ्याला ह्या देशाने मानाच्या पदावर बसवलेले होते आणि जेव्हा त्या मान्यवराची पायउतार होण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या जातीला या देशात सुरक्षित वाटत नाही म्हणून सांगून मोकळा झाला तो गृहस्थ, हे त्याच्या पदाला शोभनिय कृत्य होते का ? हि आहे का देशभक्ती ? "वंदे मातरम् " वर चर्चा करताना हि लोक म्हणतात कि, सक्ती नाही तर आम्ही का म्हणायचे ? कमाल आहे ना, सक्ती जरी नसली तरी नैतिक जबाबदारी आहे ना कि, तीही विकली ? ज्या देशात आपण राहतो त्या देशावर त्या मातृभूमीवर आपण भरभरून प्रेम करतो. सहाजिकच तिच्या गौरउद्गगारासाठी काढलेले ते बोल आहेत. दुर्दैवाने ! त्याची सक्ती करायची वेळ लवकरच येणार आहे, असे वाटते. 

          अंदमानातील अत्याचार वाचताना फार कमी लोक निशब्द होतात. माझी जन्मठेप, ५५ कोटींचे बळी, हिंदुत्व, सहा सोनेरी पाने व मोपल्यांचे बंड अशी एका पिढीच्या मनावर राज्य करणारी आणि आयुष्याला दिशा देणारी पुस्तकं खूप कमी लोकं वाचतात आणि म्हणूनच आज वाचनालयात कुठेतरी कोनाड्यात पडलेली दिसत आहेत. देश आणि देशभक्ती आमच्यातील काही लोक अंधश्रद्धा मानतात. पैशाच्या विचाराशिवाय आज कोणालाही काहीही पडलेलं नाही. १५ ऑगस्ट म्हणजे काही लोकांना हक्काने धबधब्यावर (Waterfall) जायचा सण ! पर्यटनासाठी ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जाते. या दिवसाच्या आधी काही दिवस देशभक्तीचा महापूर येतो. सिग्नलवर विकले जाणारे झेंडे १५ ऑगस्टला दिमाखात आपल्या गाडीला, कारमध्ये व छातीवर लावले जातात पण दुर्दैवाने उद्या हाच झेंडा पायदळी तुडवला जातो. ह्या विषयी कोणालाही सोयर-सुतक नसते. कोणीही उचलण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. मागच्या वर्षी दिल्लीला पुराना किल्ला जेव्हा मी बघायला गेलो तेव्हा तिथे गेटवर तिकीट घेत असताना एक सफाई कामगार पडलेले कचरा झाडत असताना पाहिला तेव्हा लक्षात आले कि, त्या कचऱ्यात दुर्दैवाने झेंडेच जास्त होते, जे मी उचलून माझ्या पाकिटात ठेवले. तरी सुद्धा त्या कामगाराला माझी कृती कळली नाही, हतबलता असते ती अशी ! फार कमी लोक आपल्या वीरांची आठवण ठेवून पावित्र्य राखतात, काळ कठीण येत आहे त्याचे हे द्योतक उदाहरण आहे. 

          आज या वीरांची आठवण काढणे दूरच परंतु जेव्हा आठवण येते तेव्हा त्यांच्या माथ्यावर अपमानास्पद बिरुदावली चिकटवली जाते. दोन जन्मठेप भोगणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्यपंक्ती अंदमानात लावलेल्या असताना काही वर्षांपूर्वी एका माजी मंत्र्याने त्या काढून टाकल्या होत्या. वीर सावरकरांचे तैलचित्र संसदेत लावण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. हिंदूंना एकत्र येण्यासाठी मंदिरातील गणपती चौकात आणणारे "लोकमान्य टिळक युगपुरुष नाहीत" असे उद्गार काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांनी काढून त्यांच्या पुण्यतिथीला शासकीय सुट्टी नाकारली होती. आज तर गणेशोत्सव कोणी सुरु केला ? ह्यावर दोन मंडळे कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. कठीण आहे हे सर्व ! भगतसिंग कोण विचारले, तर आम्हांला त्यांच्यावर चित्रित झालेल्या चित्रपटांतील हिरोंची नावे सांगितली जातात. काय फालतुगिरी आहे ते अशा प्रसंगातून आपल्याला कळते. ह्या वीरांचे जगप्रसिद्ध उद्गार आज सोशल नेटवर्किंगवर विनोदाचे साधन होऊन बसले आहे. ग्रेड नसलेल्या संघटना आज हिंदूंमध्ये आणि ब्राम्हणांमध्ये दुही तयार करण्यासाठी खटाटोप करत आहेत. 

          गेंड्याची कातडी असलेल्या अत्याचारी इंग्रजांना अहिंसेच्या मार्गाची भाषा कळेल का ? आणि जर कळली असती तर ह्या जहालवादी वीर अविचारी होते का ? वर्षानुवर्षे आम्हांला चरखा फिरवून आणि सत्याग्रह करून स्वातंत्र झालो, असे खोटे का सांगितले जाते ? जातीभेद पाळू नका सांगताना धर्माच्या नावाने फाळणी झाली, हे का सांगितले जात नाही. संपूर्ण सावरकर कुटुंब देश स्वतंत्र व्हायला प्रयत्न करत होते, त्यासाठी त्यांनी प्रचंड हालपेष्ठा सहन केल्या, हे आम्हांला का शिकवले जात नाही. "राष्ट्रपिता" म्हणून बिरुदावली मिरवलेल्या माणसाला आमच्या माथी मारून बाकीच्या वीरांना का झाकले जाते ? असे कितीतरी प्रश्न आम्हांला सतावत असतात. 

          नोटेवर फोटो, चौकाचौकात यांचीच नावे देऊन बाकीच्या वीरांना ह्या लोकांनी विसरायला लावले. आमच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे इंग्रजांचे माफीवीर म्हणतात अशा शहाण्यांनी सांगू इच्छितो, राजकारणात शत्रूशी नेहमी खोटंच बोलायचे होतं. साहजिकच माफी मागून ते तसे वागले का ? तर मुळीच नाही. देशासाठी ते कार्य करतच राहिले हेच समजून घ्यायचे असल्यास छत्रपती शिवराय वाचून पाहावेत, तेव्हा कळेल. देश स्वतंत्र झाल्यापासून बुद्धीभेद करणाऱ्या राजकीय मंडळींनी आपल्याला बाकी वीर विसरायला लावले. त्यांच्यामुळेच आज परिस्थिती वाईट ओढवलेली आहे. एक दिवसाची देशभक्तीची भरती काही कामाची नसते. त्यासाठी आयुष्यभरासाठी मनांत लढलेल्या वीरांच्या नावाने ज्योत तेवत ठेवावी लागते, नाहीतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे "अर्थात मला काय त्याचे" ह्या विचाराने देश बुडेल आणि तो दिवस लांब नसेल. 

लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.

लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960