
गोवा फक्त पर्यटनाची ओळख असलेले भारतातील महत्वाचे राज्य ! "येवा कोकण आपलोच असा" हि हाक कोकणापुरती आहे पण कोकणापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोव्यासाठी नाही. कमाल आहे ना ! तसा विचार केला तर दोन्ही प्रातांचे हवामान आणि समुद्रकिनारा सारखाचं पण कोकणात प्रेमाचा ओलावा तर गोवा म्हटले कि, समुद्र किनारा, मद्य, मासळीचे जेवण आणि पोर्तुगीजांचे ओळख सांगणारे मोठमोठाले चर्च ! फक्त इथपर्यंत सीमित असलेला गोवा इतिहासात डोकावले तर खूप विरुद्ध जाणवते आणि त्यात प्रियोळकर सरांचे गोवा इंक्विझिशन पुस्तक वाचले तर नक्कीच हिंदूंची दुखरी नस म्हणजे गोवा हे समजते. असा हा गोवा पाहण्याचा योग माझा तीन वेळा आला. आजही इतिहासाशी नाते सांगणाऱ्या मनाला गोव्यात त्याकाळी झालेल्या अत्याचारांचा वास येत होता.
ओल्ड गोव्यात हिंदूंवर अत्याचार झालेल्या बऱ्याच खुणा आढळतात पण दुर्दैवाने त्या खुणा अत्याचाराच्या भीतीपोटी मुकं आहेत. इतिहास वाचणाऱ्या माणसाच्या मनात ते अत्याचार त्या ओल्ड गोव्यातील चर्चच्या परिसरात आठवताना अश्रू आल्याशिवाय सुटका होत नाही. उगाचंच काहीतरी काल्पनिक इतिहास आणि पोर्तुगीज चमत्कार आज तिथे सांगितले जातात, खरंच कमाल आहे ना ! ह्या भूमीत आज आपल्यातील काही पर्यटक मद्य पिऊन तर्र आहेत. समुद्रात मजामस्ती करायला मुळीच आक्षेप नाही पण हिंदूंवर झालेल्या त्या काळातील अत्याचार आज मात्र विस्मरणात गेले आहेत. त्यामुळेच हिंदू व इतर धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. आज तिथे स्टाईल म्हणून आपल्यातील काही मेणबत्त्या लावणारी मंडळी मला जागोजागी भेटली. इतिहास माहित नसला तर आपण करत असलेल्या कृतीला काहीही अर्थ राहत नाही.
ह्याच गोव्यातील पोर्तुगीज त्याकाळी छत्रपती शिवराय आणि शंभुराजांसमोर थरथरले होते. डिसेंबर १६६४ ला जेव्हा समुद्रात शिवरायांचे आरमार उतरले तेव्हा "शिवाजी बलाढ्य झाला आहे, त्याला सौम्य शब्दांत समज देणे गरजेचे आहे". या आशयाचे पत्र याच गोव्याचा कॅप्टन विजरई कौंट द आलव्होरने वसईच्या कॅप्टनला पाठवले होते. "हिंदूंवर अत्याचार केले तर याद राखा," असा धमकी वजा इशारा शिवरायांनी दिला होता. बाटवाबाटवीचे धंदे करणारे, हिंदूंवर रक्तलांच्छित अत्याचार करणारे, देवदेवळे फोडणारे पोर्तुगीज आज तिथे न सांगता त्यांच्या विषयी काहीही मुळांत नसलेले विचार रुजवण्याचे चित्र रंगवले जात आहे. स.श. देसाई यांच्या पोर्तुगीज आणि मराठा संबंध या पुस्तकात एका इंग्रज अधिकाऱ्याने दिनांक ३० नोव्हेंबर १६६७ ला लिहून ठेवलेला गोव्यातील एक प्रसंग आहे. त्यामध्ये छत्रपती शिवरायांविषयी त्याने लिहिले आहे, "शिवाजीला हिंदूंच्या छळाबाबत वाईट वाटले व त्याने बार्देशवर स्वारी करून हातात लागलेल्या चार पादऱ्यांना हिंदू होण्यास सांगितले, त्यांनी जेव्हा नकार दिला तेव्हा त्याने त्यांना ठार मारले. विजरईने शिवाजीची दहशत घेतली आणि धर्मांतराबाबतचे कडक निर्बंध मागे घेतले." यावरून समजले असेल कि, त्याकाळी आपल्यावर काय काय अत्याचार झाले असतील !
ओल्ड गोव्यात जिथे पुरातत्व विभागाचे संग्रहालय आहे तिथे १५१० सालातील एक चर्चसुद्धा आहे, जिथे सेंट झेव्हिअर फ्रान्सिसचे शव ठेवले आहे, त्या परिसरात एक खांब आहे त्याला "हातकातरो खांब" म्हणतात. याच खांबाला हिंदूंना बांधून धर्मांतरासाठी अत्याचार केले जात असत. आज तो खांब सुशोभित केलेला दिसतो. (वरील फोटोत तुम्ही पाहू शकता.) जेव्हा संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले होते तेव्हा त्यांच्या पासून वाचण्यासाठी त्या प्रेतासमोर ह्याच चर्चमध्ये पोर्तुगीज कॅप्टन विजरईने प्रार्थना केली होती. अरे, थरथरले होते शव जेव्हा शंभुराजांचा राग त्याने जाणला होता, आज तिथे नेमका ह्याच इतिहासाचा विसर पडला आहे. तेथील गाईड हे न सांगता, चमत्कार म्हणून काहीही काल्पनिक इतिहास रंगवून सांगत आहेत. आज हे सर्व पर्यटक मंडळी आवडीने पाहतात परंतु हा इतिहास माहित नाही आणि गोवा म्हटल्यानंतर ह्या ऐतिहासिक विचारांचा तिळमात्र संबंध त्यांना जाणवत नाही. ज्या राज्याचा इतिहास माणसांना माहित नसतो, त्या राज्याच्या भौगोलिक सीमा कधीच संरक्षित राहत नाहीत.
गोव्यामध्ये बिचोलीम नावाचे गाव आहे, ज्याचे ऐतिहासिक नाव "डिचोली" होते. इथे आपले शंभूराजे मोहिमेवर असताना काही दिवस वास्तव्यास होते. औरंगजेबाचा चौथा पुत्र अकबर जेव्हा संभाजी राजांच्या आश्रयास आला तेव्हा याच गावात त्याला एक वाडा बांधून दिला होता. या गावात मराठ्यांचा इतिहास जागवणारे तसेच नाणे संग्राहक श्री. गोविंद साखळकर राहतात त्यांना घेऊन तुम्ही कधीतरी गोव्याची सफर करा म्हणजे ह्याच गोव्यात मराठ्यांचा खुणा खूप काही सांगून जातील. याच गोव्यात नार्वे गावात सप्तकोटेश्वरचे मंदिर आहे. येथील मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६८ मध्ये केला होता तसेच त्यांनी सप्तकोटीश्वराचे दर्शनसुद्धा घेतले होते. आज तिथे साडे तीनशे वर्षांपूर्वीचा शिलालेख सुद्धा आहे. गाभाऱ्यातून एक भुयार आहे. मंदिराच्या समोर टुमदार पुष्करणी असून मागील बाजूला जवळ जवळ हजार वर्षांपूर्वीची जांभा दगडातील कमानी असलेली अखंड तटबंदी आहे. काही देवड्या आज मातीने भरलेल्या असून लुप्त व्हायच्या बेतात आहेत. ह्याच अर्धवट बुजलेल्या देवड्यांच्या अवशेषांमध्ये कमलपुष्पशिल्प खुणावते. (संबंधित सर्व फोटो तुम्ही या लेखाच्या शेवटी पाहू शकता.) हेच मंदिर एकेकाळी इसवी सन नवव्या शतकातील कदंब घराण्याचे आस्थेचे स्थान होते, त्यांच्या नाण्यातील एका बाजूला "श्री-सप्तकोटीश-वरविरा-जयकेशी-देव-मालवरामारी" असे असून ह्या मंदिराचा इतिहास किती जुना आहे, हे समजून येते. ह्या मंदिरात दगडी जुन्या मुर्त्या असून शिवलिंग मात्र सोने, रूपे, तांबे, लोखंड, कथील, शिसे आणि कासे अशा सप्तधातूंच्या रसाने बनवले आहे म्हणून या शिवलिंगाला सप्तकोटीश्वर म्हणत असावेत. इतर मंदिरांप्रमाणे हे मंदिर सुद्धा १५१० साली पोर्तुगीजांच्या वावटळीत सापडले आणि त्याची प्रचंड प्रमाणात नासधूस झाली. ५९ वर्षांचा आफॉंस-ड-आल्बुकेर्क नावाच्या पोर्तुगीज गव्हर्नरने हे मंदिर पाडून तिथे चर्च बांधले. ह्या मंदिरातील शिवलिंग विहिरीवर आडवे टाकून ख्रिस्ती लोक त्यावरून पाणी काढू लागले. इतके अत्याचार त्याकाळी आपल्या देवांनीसुद्धा सहन केले आहेत, आज ह्याचा कुठेतरी विसर पडला आहे. आदिलशाहीत असलेल्या गोव्यात हिंदूंना गुलाम करून विकल्याचे पुरावे नाहीत परंतु ह्या पोर्तुगीजांनी हिंदूंना गुलाम म्हणून विकल्याचे कित्येक पुरावे आहेत. त्याची सुरुवात १५१० मध्ये गोवा जिंकलेल्या आल्बुकेर्कने केली. हिंदू त्यांची मंदिरं, देव व धर्म सर्वच ह्या पोर्तुगीजांच्या भक्ष्यस्थानी पडले होते. ह्याच गावात काही अंतरावर शंभूराजांनी गोव्यात जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे "जुवेचा किल्ला" ! आज हा किल्ला अखेरच्या घटका मोजत आहे तसेच इथे कोणी पर्यटक फिरकतसुद्धा नाहीत कारण गोव्याची ओळख समुद्री पर्यटन आणि मद्य अशी झालेली आहे. याच परिसरात विजरई आणि मराठ्यांमध्ये हातघाईची लढाई झाली. ह्याच जुवे बेटातून पळून विजरई थेट ओल्ड गोव्यातील सेंट झेव्हिअर चर्चमध्ये त्या प्रेतासमोर प्रार्थनेसाठी आला. तेव्हाच मांडवी नदीत आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे संभाजी महाराज गोव्यात येऊ शकले नाही आणि साहजिक सेंट झेवियरने चमत्कार घडवला असा समज करून बसले. आजही आपले लोक यावर विश्वास ठेवत आहेत. गोव्यात आलेले पर्यटक मजामस्ती सर्व काही करतात, त्या चर्चमध्ये जातात पण खूपच कमी लोक या सप्तकोटीश्वर मंदिराकडे फिरकतात. जवळ जवळ तिथे कोणीही येत नाही, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. मंदिराच्या परिसरात चोरदिंडी असून जी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या हाताला पाहू शकता.
बिचोलीममध्ये असाच एक किल्ला आहे. ज्याचे नाव आहे, कोलवाळचा किल्ला ! १६३५ मध्ये हा किल्ला पोर्तुगीज तत्कालीन व्हाइसरॉयच्या आदेशावरून डी-मिगेल-डी-नोरोन्हा व कंडे-डी-लिन्हारेस यांनी बांधण्यास सुरवात केली व १६८१ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. १६८३ मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांनी या किल्ल्यावर आक्रमण केले होते. मराठ्यांच्या हल्ल्यापासून बार्देश सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी अडथळा म्हणून हा किल्ला वापरत असत. त्याकाळी हा वैभवशाली असेल कारण आज त्याच्या अवशेषांची रचना नजर खिळवून ठेवते. त्याकाळी ह्या किल्ल्याचे संरक्षण करणारा एक मोठा खंदक होता. आजच्या त्याच्या खोलीवरून त्याचा दरारा जाणवतो. ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीत गाडले गेले असून बाजूने या अवशेषांना तुडवत रस्ता गेला आहे. तरी सुद्धा पाच बाजू शाबूत असलेला अतिशय सुरेख असा जांभा दगडातील षटकोनी बुरुज तग धरून आहे. याच बुरुजाला एक चोरदिंडी आहे. ऐतिहासिक नजरेतून याची सौंदर्यता तसूभरही कमी झालेली नाही. आज रस्ता तटबंदीला लागून गेला असून काही ठिकाणी बाकी बुरुजांच्या खुणा शिल्लक आहेत. तटावरच्या फांजीवरून आज जवळजवळ तीन-चार किमीचा रस्ता केला आहे. ज्यावरून वाहने धावतात. इथे ऐतिहासिक दोन त्रिकोणी खांबाचा संपूर्णतः जांभा चिरे रचून तयार केलेला एक पूल असून ह्यावरून बरीच लहान वाहन आज जातात. पुलाखालून बरंच पाणी जरी वाहून गेले असले तरी इतिहास पाहणारा हा पूल पाहण्यासारखा आहे. ह्या पुलाला दोन त्रिकोणी खांब असून पाण्याच्या निचराही तितकाच वेगात होतो, हि सर्व ठिकाणं गोविंद साखळकर सर अगदी सहज आणि माहितीसकट दाखवतात. कोकणाला चिकटून उभे असलेले हिंदूंचे गोवा आज कुठूनही आपले वाटत नाही. इस १५६८ साली हे पोर्तुगीज लोक मडगाव शहरात घुसले इथे गायी मारून त्यांचे मांस हिंदूंच्या तोंडात कोंबले व त्या गावातील हिंदू मंदिरे भ्रष्ट केली. धर्मांतर इतके झाले कि, त्यावेळी हिंदू औषधालासुद्धा उरला नव्हता.

लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सप्तकोटीश्वराचे मंदिर..
मंदिराच्या आतील बाजूला असलेले भुयार
मंदिरात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा शिलालेख
मंदिराच्या मागील बाजूस असलेली जांभा दगडातील तटबंदी
अग्वादचा किल्ला - वरील बाजू
अग्वादचा किल्ला - खालील बाजू
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment