शिल्प अभ्यास दौरा आणि बरंच काही....

​कधीपासून मनांत होते आणि हो-नाही करत, एकदाचा होकार कळवला आणि लागलीच मित्रमंडळी तयारीला लागली, या वेळचा दौरा होता मंदिर व शिल्प शैली सविस्तर जाणून घेण्याचा ! बऱ्याच स्थळांचा अभ्यास दोन दिवसांत करून यायचे Done केले. सुरुवात होती सज्जनगडापासून पण वाटेत बरीच स्थळ होती, जी ऐतिहासिक दृष्टिकोनातून निदान पटापट बघणं गरजेची  होती. 

          सकाळी लवकरच सर्व मित्रमंडळीने अगदी वेळेवर तयार होऊन खोपोलीतून साताऱ्याकडे कूच केले. कार्ले आणि भाजे लेण्यांच्या मधोमध एक्सप्रेस हायवे वरून वेगाने कार दौडत होती. वाटेत किल्ले विसापूरच्या तटबंदीने खुणावले आणि त्याचवेळी नेमकी वेळ झाली बौद्धकालीन मार्ग समजून घेण्याची ! साधारणतः इस पूर्व दुसऱ्या शतकात गौतमीपुत्र सातकर्णी भाजे लेण्यांकडे गेला होता, स्मरण झाले त्या योध्याचे ! फटाफट तो मार्ग समजून घेऊन झटपट एक सेल्फी मारून कात्रज बोगद्याच्या पुढे आमची कार विसावली कारण आठवण झाली, ५ एप्रिल १६६३ ला विजेच्या वेगाने शिवरायांनी मारलेल्या लालमहाल छाप्याची, हो ! ती भन्नाट मोहीम आठवून ती समजावून अदृश्य दिसणाऱ्या राजगडाला वंदन करून आता मात्र आमची कार सज्ज झाली, ती थेट खंबाटकी घाट पार करायला ! तो पार केल्यानंतर नैसर्गिकरित्या जावळीची तटबंदी म्हणजे आताच्या पवनचक्क्या असलेली ती डोंगररांग ! तसेच जेवणाची वेळसुद्धा झाली होती. मस्त जेवणावर ताव मारून जावळीच्या तटबंदीवर चर्चा करून आम्ही कूच केले ते सज्जनगडाकडे......

राष्ट्राच्या कल्याणार्थ ते घोषत होते मंत्र ।

राष्ट्राच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ ।।


          दूरवर सज्जनगडाने दर्शन दिले बाजूला अजिंक्यतारा पहारा देत होता. अफाट झुंजलेला तो गड आणि इतिहास मनात आठवून मनोमन वंदन केले. कास पठार फक्त २१ किमी होते पण वेध लागले होते समर्थांच्या भेटीचे ! फक्त रंगबेरंगी फुले पाहून मन खुश करण्यापेक्षा समर्थांच्या भगव्या रंगाची आम्हांला जास्त ओढ होती. 


सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापुरी ।

नावे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीच्या तिरी ।।

साकेताधिपती कपी भगवती हे देवे ज्याच्या शिरी ।

येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी ।।


          व्वा ! त्या आल्हादायक वातावरणात गड चढायला सुरुवात झाली. त्यावेळी समर्थांनी ११ मारुती स्थापन केले होते, आज ते आपल्याला पायऱ्या चढताना प्रतिकात्मक मूर्त्या दर्शन देतात. कुंद वातावरण आणि भुरभुरणारा पाऊस उत्साह वाढवत होता. काहीही म्हणा एक अदृश्य शक्ती तिथे आपल्याला दर्शन देते, फक्त मनात जय जय रघुवीर समर्थ म्हणा. समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्या वास्तूच्या खाली असलेल्या ध्यानस्थ घळीत तो वास अनुभवला. इतकं सार असताना आज समाजातील फालतू ग्रेड असलेली संघटना समर्थांविषयी गैरसमज पसरवत आहे, ह्याची खंत वाटली. काही लोक तर अजूनही शिवराय आणि समर्थ ह्यांची भेट झाली कि नाही ? ह्यामध्ये अडकून पडले आहेत. ते दोन महान आत्मे वेगळे कधी झाले होते ? ह्यावर चिंतन करा म्हणजे त्यांची भेट कधी झाली ते कळेल. डोक्यात हि चक्र वेगाने फिरत होती आणि तितक्यात "अखंड सावधान असावे" अशी आकाशवाणी कानावर पडली. पुन्हा ती स्तब्धता आणि शांतता....

          मन काही त्या वास्तूतून निघत नव्हते सरते शेवटी आम्ही निघालो ते धाब्याच्या मारुतीकडे ! पावले चालत होती, अनवाणी पायाला खडे टोचत होते आणि मनात मात्र आठवण आली ज्वलज्वलनतेजस शंभूराजांची.... ह्याच रस्त्यावर त्या महान माणसाची वंदनीय पावले पडली होती आणि मन भरून आले कारण ती इतिहासात अपूर्ण राहिलेली समर्थांची आणि शंभुराजांची भेट आठवली. सुरीने सपकन बोट कापावे तसा मनावर जोरदार प्रहार झाला कारण त्यांची भेट झाली असती तर.... खूप काही गोष्टी बदलल्या असत्या पण इतिहासात जर-तर ला काही स्थान नाही. मन थाऱ्यावर आले. जड अंतकरणाने निघालो ते परळी गावातील मंदिर पाहायला.

यादवांच्या आधीचा काळ असेल. परळी गावाच्या अगदी शेवटी दोन भग्न झालेली आणि अखेरची घटका मोजणारी दोन भूमीज शैलीची मंदिरं आहेत. पहिल्या मंदिराच्या समोर समाधी शिळा असून चौकट वितान असलेले गर्भगृह शिल्लक आहे. बाकी सभामंडप संपूर्ण पडला आहे. विष्णूची मूर्ती आणि पिंड असून कळसाची शिळा सरकल्यामुळे पावसाचे पाणी आत पडत आहे. द्वारावर शाखापट्टी व बऱ्याच ठिकाणी आभासी नक्षीचे किर्तीमुख कोरलेले आहे. ह्या मंदिरावर बाकी अतिशय जबरदस्त अशी नक्षीकामयुक्त स्तंभ दिसून येतात. अखंड दगडात कोरलेला स्तंभ आणि त्यावरील नाजूक नक्षीकाम मनाला भावते. ह्या मंदिराच्या समोर रंगशिला आहे ज्यावर एकेकाळी कलाकारांनी कला सादर केलेली असेल. खरंच, इथेच नेमके थोडंस मी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आलो काय वैभव असेल ना ह्या मंदिरांचे ! दुर्दैवाने आज त्या रंगशिलेवर अवशेषांचा धोंडा ठेवलेला आहे. 

          अखेरच्या घटका हि दोन्ही मंदिर मोजत आहेत. बाजूला एक प्रशस्त मंदिर असून कितीतरी युद्ध आणि तोडफोड मुकाट्याने सहन करणारा व पाहणारा मानस्तंभ भग्न चौथरावर काळाच्या ओघात काहीसा कमरेत कललेला आहे. ह्या मंदिराच्या तलविन्यासचा विचार केला असता, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह सुस्थितीत आहे. कळस मात्र बुतशिकन पदविधाऱ्यांनी पाडला आहे. त्यामुळे साहजिकच आता दिसणारा कळस अलीकडील आहे. 

          मानस्तंभाच्या बाजूला अतिशय दुर्मिळ असे पंचमुखी शिवलिंग असून चार मुख चार दिशांना व एक मुखवटा अर्धवट स्वरूपात दाखवून सदाशिव लिंगाचे अव्यक्त स्वरूप प्राप्त केले आहे. सदाशिव म्हणजे सद्योजत, वामदेव, अघोर, तत्पुरुष आणि ईशान ह्या पाच अवस्था त्यात दर्शविलेल्या असतात म्हणजेच ह्याला पंचवस्थितीत अजून फोडून सांगायचे झाले तर पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश ह्याचे प्रतीक आहे. खालील फोटोत पाहू शकता.

          मंदिरात जाताना बाजूला असलेल्या तटाला खूप अशा विरगळ व सतीशिळा रचून ठेवलेल्या पाहता येतात. काही शिळा ह्या अतिशय दुर्मिळ असून महाराष्ट्रात बाकी ठिकाणी दिसत नाहीत. लढलेल्या खुणा जपत त्या विरगळी व सतीशिळा आज चारही बाजूंनी वाढलेल्या गवतात हरवलेल्या आहेत. त्यावेळी शत्रू चहूबाजूंनी होता आणि हा वीर लढला म्हणून देव व धर्म वाचला आणि म्हणूनच आपण आहोत पण आज चहूबाजूंनी गवत माजले आहे आणि त्यात हा वीर मूकपणे पाहत आहे. वाईट ह्याचे वाटते कि, ऐतिहासिक वास्तू व अवशेषांविषयी आपल्या लोकांमध्ये अजूनही क्रांती झालेली नाही. ह्याच उघड्या मंडपात भग्न नंदी उन, वारा व पाऊस झेलत असून त्याचे शीर आढळत नाहीत. त्यामुळे साहजिकच साधारणतः आज हा दोन तुकड्यात आढळतो. शीर लावण्यासाठी केलेली खोबणी (Internal Locking)दिसून येते, जी शिल्प अभ्यासकाला बऱ्याच गोष्टी शिकवून जाते. मंदिराच्या बाहेरील बाजूस आभासी व मैथुन शिल्प आहेत.  मैथुनातसुद्धा एक ध्यानस्थ योगी दाखवला असून तो लक्ष वेधून घेतो. ह्या क्रिया एकाग्रतेने पार पाडण्यासाठी तो प्रतिकात्मक दाखवलेला आहे. सभामंडपाच्या आतमध्ये छोटे छोटे सहा दगडी मंडप प्रत्येकी चार गोलाकार व चौकोनी स्तंभांवर पेलून आहेत. रंगशिलेवर त्यावेळचा नंदी आरूढ असून जो त्या ठिकाणावर अलीकडे ठेवल्यासारखा वाटत आहे. ती निरव शांतता आणि एकाग्रता मनाला ऊर्जा मिळवून देते. गाभाऱ्याच्या द्वारावर शाखापट्टी असून किर्तीमुख लक्ष वेधून घेतात. गाभाऱ्यात सयोनिज शिवलिंग असून काळा बेसॉल्ट सौंदर्याने खुलून गेलेला आहे. दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आम्ही पडलो. बाजूला मन प्रसन्न करणारा संपूर्ण एका दगडात कोरलेला आभूषणांनीयुक्त असा गणपती बाप्पा ठेवलेला आहे. पाहूनच मन प्रसन्न होत राव ! समोर चिटुकला नंदी असून त्याचा तो निरागस चेहरा ! अहाहा ! काय सांगू हे प्रत्यक्ष पाहून जो आत्मिक आनंद वाटतो, तो कशातच नाही. हे सर्व पाहत असताना एकच जाणवते, ते म्हणजे  "नक्कीच देव इथे आहे." तिथून काही अंतरावर एक घुमटाकार वास्तू असून बाहेर एक भग्न नंदी आहे व आतमध्ये गाभाऱ्यात प्रचंड पाणी साठलेले आहे. थोडे घाबरतच गवतात पाय ठेवून आम्ही तिथे गेलो; मोबाईलच्या फ्लॅशच्या प्रकाशात आतमध्ये पाहिले व विशेष असे काही दिसले नाही. 

          परळीची हि दोन्ही मंदिर मनांत आणि कॅमेरात साठवून त्या कातरवेळी आम्ही नरसोबाच्यावाडीला निघालो. आता मात्र पोटात काव काव सुरु झाली होती. वाटेत पेठ नाक्याला जेवणावर येथेच्छ ताव मारला. नरसोबाच्यावाडीला पोहचलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते. शांतता न ढवळता, हळुवारपणे हॉटेलमध्ये झोपी गेलो ते सकाळी फ्रेश होऊन दिगंबरा दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषात कृष्णेच्या काठावर त्या मंदिरात वंदन केले आणि निघालो त्या आडवळणावरील स्वर्गात....!

          ओढ लागली होती कोपेश्वराच्या भेटीची ! ओढ लागली होती विविध शिल्प पाहण्याची ! ओढ लागली होती निसर्गाचा आविष्कार दाखवणाऱ्या त्या गर्द वडाच्या झाडांच्या सावलीची ! पावसाने चांगलीच कृपा केली होती आणि सकाळी साडे नऊच्या सुमारास ऐतिहासिक सैनिक टाकळी गावातून खिद्रापुरात पोहचलो. सर्व प्रथम जैन मंदिर आणि त्यावरील शिल्प पाहिली. पुत्रवल्लभा, विषकन्या, विविध नर्तकी पाहून मन सुखावले पण ओढ होती कोपेश्वराची ! पुढच्या पाचच मिनिटांत आम्ही तिथे पोहचलो. कृष्णेच्या काठी महाराष्ट्र आणि पलीकडे कर्नाटक अशी भौगोलिक रचना असलेली हि भूमी ! इथेच पलीकडे कर्नाटकात असलेल्या शहापूर ह्या गावी ह्या मंदिराला उपद्रव देणाऱ्या औरंगजेबाची छावणी पडली होती. ते समजून घेऊन आणि वडाच्या झाडांची माहिती घेऊन आम्ही मंदिराच्या नागरखान्यातून आतमध्ये गेलो. अहो, स्वर्गच ओ ! नुसताच संगमरवरात बांधलेला ताजमहालसुद्धा फिका पडतो ह्या कलाकृतीपुढे ! भरघोस बोलकी शिल्प आणि त्यांचे भाव समजून घेताना त्या शिल्पकारांच्या हातात देवच नांदत होता, ह्याचा प्रत्यय तिथे आल्याशिवाय राहत नाही. मंदिराच्या सभामंडपात स्तंभावर कोरलेल्या पंचतंत्रातील गोष्टी जेव्हा पाहिल्या तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. ह्या मंदिराविषयी खालील दिलेल्या लिंकवर संपूर्ण माहिती आपण वाचू शकता.

https://survesagar.wordpress.com/2017/05/29/आड-वळणावरील-स्वर्ग-कोपेश/

          जवळ जवळ चार तास मंदिर पाहत समजून घेत आम्ही फिरत होतो कळत नकळत किती लोक आमच्या बरोबर फिरत होती, हे समजलेच नाही. त्यात वयस्कर आजी-आजोबा एकमेकांना आधार देत आमच्या बरोबर माहिती समजून घेत होते आणि पडलेले प्रश्न तिथेच मला विचारून शंका निरसन करून घेत होते. ह्या वयात त्यांचा असलेला उत्साह पाहून मन भरून आले. जड अंतःकरणाने मंदिराचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरु केला पण तेव्हाच मनांत आले कि, जवळपास असलेले लिंब गावातील शाहू महाराजांनी बांधलेली आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली बारा मोटेची विहीर पाहून जावे. सर्व प्रथम जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. ह्या शिल्पांच्या यात्रेत आज क्रिकेटची मॅच होती, हे विसरूनच गेलो होतो. हॉटेलमध्ये जेवताना थोडी झलक पाहून आम्ही निघालो ते थेट शेरी लिंबकडे ! 
व्वा ! अजोड तंत्रज्ञानाने युक्त भव्य अशी हि विहीर पाहताना काळजाचा ठोका चुकतो राव ! जणू काही एखाद्या इमारतीचे मजले उतरत आम्ही त्या विहिरीत पोहचलो. अफाट पाण्याचा साठा आणि चारही बाजूला असलेले शरभ शिल्प ! शिल्प नावाला ओ, त्या मूर्त्याच होत्या. मागील बाजूला असलेले केवल शरभ शिल्प पाहून मराठ्यांची आक्रमकता दिसून येते. आज मशीनला लाजवेल अशा घडवलेल्या त्या शरभाच्या मूर्त्या इतक्या जिवंत वाटत होत्या कि ते शब्दांत मांडता येणार नाही. 

आता सर्व आटपले होते, दौरा सुफळ संपूर्ण झाला होता. कारमध्ये बसून चर्चेत फक्त शिल्पच होते. शरीराने घरी चाललो होतो मन मात्र शिल्पांभोवती घिरट्या मारत होते. 

या शिल्प अभ्यास दौऱ्याविषयी खाली काही फोटो जोडत आहे.
परळी गावातील मंदिराच्या बाहेरील हा नंदी

कृष्णा नदीचा काठ व पलीकडे कर्नाटक जिथे औरंगजेबाची छावणी पडली होती.

स्वर्गमंडपाच्या आतून दिसणारे आकाश !


लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.


लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.

© सागर माधुरी मधुकर सुर्वे 

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960