विस्तीर्ण पसरलेला सह्याद्री आणि त्याच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळातील सर्वसामान्य लोकांना घेऊन निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य आजही आदर्शवतच आहे. मावळातील सर्वसामान्य लोक मराठेशाहीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र आले आणि त्यांना मावळे संबोधले गेले. स्वराज्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश म्हणजे सूर्याच्या मावळतीची दिशा म्हणून त्याला "मावळ" म्हणतात. अशी कथा सांगितली जाते. हा मावळ विस्तीर्ण असल्यामुळे त्याचे बारा भाग करण्यात आले. पवन, हिरडस, गुंजन, पौड, मुठा खोरे, कानद खोरे, मुसे खोरे, वळवंड खोरे, रोहिड खोरे, आंदर मावळ, नाणे मावळ आणि कोरबारसे मावळ ! पवन मावळ हा त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे. ह्या मावळांचे रक्षण करण्यासाठी उत्तुंग असे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा इ. गडकिल्ले सीमेवर छातीचा कोट करून उभे ठाकले आहेत. ह्या पवन मावळात येण्यासाठी चौफेर बाजूला तळेगाव, उर्से, बऊर, आपटी व दुधिवरे खिंड आपले स्वागत करतात. निसर्गाने संरक्षित केलेल्या ह्या पवन मावळाला छत्रपती शिवाजी महाराजांनी साद घातली त्याचे नैसर्गिकदृष्ट्या वेगळेपण ओळखले आणि म्हणूनच सुरतेच्या पहिल्या लुटीतील संपूर्ण खजिना लोहगडावर संरक्षित ठेवला, हि आहे खासियत मावळाची ! ह्या मावळातील भाजे, कार्ले आणि बेडसे लेणी म्हणजे सह्याद्रीतील आभूषणं आहेत ! तर असा हा पवन मावळ मंदिर स्थापत्यात मागे राहील का ? तर त्याचे उत्तर कदापि "नाही" असे आहे.
कालांतराने सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले, वस्ती वाढली आणि अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या पाण्यासाठी मोठमोठाले धरणं बांधायला सुरुवात झाली मग पवन मावळ कसा मागे राहील ? पवना नदीवर अजस्त्र अशा धरणाचे काम सुरु झाले. इतिहासाच्या बाबतीत आपले दुर्दैव हे कि, ढासळत असणाऱ्या वास्तू वाचवल्या जात नाहीत तर धडधाकट प्राचीन वास्तू जेव्हा धरणात अथवा रस्ता रुंदीकारणात जातात तेव्हा त्यांचा वाली देवसुद्धा नसतो. असाच एक फटका ह्या पवन मावळात एका आडवाटेवरील मंदिराला बसला. पवनानगरच्या पुढे वाघेश्वर नावाचे टुमदार गाव वसले आहे. कोणे एकेकाळी ह्या गावाच्या मागून पवना नदीच्या ओढीने धावत जाणारा टुमदार नाला वाहत होता. ह्याच नाल्याच्या काठावर गर्द अशा झाडीत इथे यादवांच्या काळातील वाघेश्वराचे मंदिर उभे राहिले. वरील फोटोत पाहू शकता. शुष्कसांधीच्या स्थापत्यात रचलेले महादेवाचे मंदिर बाजूने वाहणारा नाला, गर्द झाडी आणि थंड वाऱ्यात इथे दर्शनाला येणारे भाविक तर प्रवास करणारे वाटसरू क्षणभर का होईना, इथे विसावत असत. ह्या शांत अरण्यात कोकिळाचे गान, तो घंटेचा हळुवार नाद आणि एकवारएक रचलेले ते काळेकभीन्न दगडसुद्धा रोमांचीत होत असतील. दुरून तुंग, तिकोणा, लोहगड आणि विसापूर हे उत्तुंग गड ह्या मंदिराला मनोमन वंदन करत असतील.
दूरवर दिसणारी लोहगड - विसापूरची जोडगोळी खालील फोटोत पाहू शकता.
आज वाहनमंडपातील नंदी पूर्ण भग्न झाला असून त्याच्या मुखाची शिळा तात्पुरती रचलेली दिसली परंतु त्याला सुद्धा आधार द्यावा लागला आहे. (वरील फोटोत पाहू शकता.) वाहनमंडप तर पूर्णतः नेस्तानबुत झाला आहे. प्रवेशद्वारावर रत्नशाखा आहे, देव तिथे वास करतो असे म्हणतात. उंबरठ्यावर किर्तीमुख असून एक रत्न मध्यभागी आहे. द्वारललाटबिंबावर पार्वती असून दुसऱ्या शाखेतील द्वारललाटबिंब भग्न झाले आहे. आतमध्ये स्तंभ काही चौकोनी तर काही गोलाकार आहेत. सभामंडपात रंगाशिला आहे कि नाही ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कारण चार महिने पाण्याबाहेर दर्शन देणाऱ्या मंदिरात लादी लावली असून रंगशिला असल्यास ती गाडली गेली असावी, असे वाटते. सभामंडपातील देवकोष्ठ भग्न झाले आहेत. तर एका बाजूचे देवकोष्ठ अस्तित्वात नाही. ह्याच सभामंडपात बारीक नजरेने पाहिल्यास एका बाजूला वितानमध्ये दैत्य आहे. हो ! रागाने नाकपुड्या फुगवलेला, सुळे बाहेर आलेला आणि मोठी कर्णफुले परिधान केलेला हा दैत्य आजही आपल्याला घाबरवतो. अंतराळात गोंडस गणपती बाप्पांच्या दोन मूर्त्या ठेवल्या आहेत. बहुतेक त्या बाहेरील देवकोष्टतील असाव्यात. दोन पायऱ्या उतरून आपण गर्भगृहात पोहचतो तेव्हा शिवलिंगाचे दर्शन होते. लिगांवरील शाळुंका बाजूला काढून ठेवली असून तिचा अर्धा भाग आतमध्ये तुटलेला दिसतो. समोरच देवता असून तीसुद्धा जीर्ण होत चाललेली आहे. हे सर्व पाहता, त्या मंदिराची भव्यता डोळ्यांसमोर उभी राहते.
गावातील वृद्ध लोकांच्या सांगण्यावरून ह्या मंदिराच्या आजूबाजूला ७० विरगळ होत्या, आज सातसुद्धा विरगळ सुस्थितीत नाही, फक्त तुकडेच तुकडे ! ह्या मंदिराच्या परिसरात बऱ्याच समाधीशिळा दिसतात. ज्या ह्या धरणातील गाळात अगदी रुतून बसल्या होत्या. समाजसेवक नवनाथभाऊ पायगुडेंच्या प्रयत्नामुळे ह्या सर्व तत्परतेने काढून त्यांनी त्या मंदिराच्या जवळ आणून ठेवल्या आहेत. असे हे पवना धरणात लुप्त होणारे एकेकाळचे भव्य मंदिर व आपल्या पूर्वजांचा ठेवा म्हणून आपण एकदा तरी पहावे म्हणून हा लेखप्रपंच !
ह्या वाघेश्वर मंदिराचे काही खास फोटो तुमच्यासाठी....
मंदिराबाहेरील अवशेष
सदर माझा लेख २० मे २०१८ ला तरुण भारत ह्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता, खालील लिंकवर तुम्ही तो पाहू शकता.
http://epaper.mahamtb.com/epaper.aspx?lang=2026&spage=Mpage&NB=2018-05-20#Mpage_8
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment