
ती ९ नोव्हेंबरची रात्र गड जागता होता कारण जावळीत अफजल आला होता. महाराज त्या दरबारात फेऱ्या मारत होते. सर्वच एका दबावात होते कारण उद्या भेट ठरली होती क्रूरकर्मा अफजलशी ! याने छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी यांची हत्या केली होती. शहाजी महाराजांना दगा फटका करून अटक केली होती. भवानी माता सुद्धा याने फोडून तब्बल ६०० मंदिरे उध्वस्त केली होती. महाबळेश्वरच्या पायथ्याला वाईमध्ये असलेले बावधन गाव बाटवले होते, बाळसं घेणारे हिंदवी स्वराज्य आता मरणाच्या दारात उभं होतं, अशीच काहीशी स्थिती झाली होती. मागच्याच महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी बाळ शंभू राजांची आई सईबाई या निधन पावल्या होत्या. दुःखाचा डोंगर सरतो ना सरतो तोच हा क्रूरकर्मा येऊन ठेपला होता. हि हिरवी पिलावळ हिंदवी स्वराज्य संपवण्याची भाषा आता करू लागली होती पण महाराज शांत होते. ती रात्र हळूहळू सरत होती आणि अवघ्या सर्वांवर दबाव वाढत होता, भेट ठरली होती त्या सांडाबरोबर ! पंताजी काका उर्फ गोपीनाथपंत बोकीलांनी वकिली उत्तम वठवली होती आणि हा बत्तीस दातांचा बोकड आता जावळीत सजवून आणला होता. आता वेळ होती बळीची....
न भूतो न भविष्यती दिवस उगवला विकारीनाम संवत्सर मार्गशीष शुद्ध सप्तमी ज्युलियन कालगणनेनुसार १० नोव्हेंबर १६५९ ! हो कालगणना सांगितलेली बरी ! महाराज आज पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे इथे तुमचा पराक्रम नाही तर दिनांक आणि तिथीमध्ये आपले so called भक्त मंडळी अडकली आहे. असो ! विषयानंतर नको तर दिवस उगवला हिंदू धर्माचा ! बऱ्याच गोष्टी झपाट्याने जुळून आल्या होत्या, कळस मात्र बाकी होता आणि तो महाराजांच्या स्वहस्ते रचला जाणार होता. वेळ ठरली दुपारी २ ची !
छत्रपती शिवाजी महाराज तो गड ९ वेळा उतरून परत चढून गेले कारण होते सय्यद बंडा हा नक्की कुठे उभा आहे ? कारण तो १० हातांवरील माणूस सहज पट्ट्यामार्फत उडवतो आणि तो बाजूला होणे गरजेचे होते आणि राजकीय सोंगटी हलवली. पंताजी काकांमार्फत त्याला थोडे लांब बाजूला केले गेले. आण्णाजी मलकरेंनी जबरदस्त असा शामियाना उभारला होता छत्रपती शिवाजी महाराज आता स्वतः शामियानात आले. अफजल येऊन बसला होताच आणि आलिंगन दिले आणि दगा केला, कोणी ? माहित नाही इथे आम्ही अडकतो कारण पुरोगामी विचारजंतांच्या डोक्यात “अतिथि देवो भव” चा जंतू वळवळतो आणि स्वराज्य संपवायला आलेला अफजल यांना जवळचा वाटतो. छत्रपती शिवरायांनी वाघनखांचा मारा केला आणि टराटरा फाडले अफजलच्या पोटाला ! या झटापटीत शिवाजी महाराजांच्या डोक्याला जखम झाली पण अफजल मात्र कायमस्वरूपी झोपी गेला. हिंदू धर्म बुडवायला आलेला अफजल स्वतःच बुडला होता. महाराज वेगाने बाहेर आले आणि कृष्णाजी भास्कर मध्ये आलाच. हाच तो अफजलचा वकील पण याचा सुद्धा खात्मा झाला असे काही दस्तावेज सांगतात तर काही ठिकाणी जिवंत सोडला असे म्हणतात पण दुर्दैवाने आज तो जिवंत आहे आणि शिग्रेड मार्फत त्याला अभय दिले असून खास जातिभेदासाठी ते कार्ड वापरले जाते. यांना अफजल मारल्याचे ठावच नाही तर कृष्णाजी भास्कर मारल्याने हे आनंदित आहेत आणि आम्ही तर दोघांना मारल्याने आनंदित आहोत कारण हिंदवी स्वराज्याच्या आड जो येईल त्याचा अफजल होणारच याचीच शिकवण यातून मिळाली.
महाराज आज गोष्टी बदलल्या आहेत, “अरे बघतोस काय रागाने तर कोथळा काढलाय वाघाने” असे दारू पिऊन अगदी त्वेषात बोलले जात आहे. लाज वाटत नाही ह्यांना दारू पिऊन बोलायला ! महाराज तुम्ही अफजल मारण्यासाठी अभ्यास केला होता; शांत डोकं ठेऊन स्वतः रणात न जाता त्याला जावळीत यायला भाग पाडले होते कारण हि राजकीय चाल होती पण आज ह्या बाबत कोणालाही घेणं देणं नाही कारण इथे फक्त भांडणात त्वेष ठेऊन या युद्धाची आठवण केली जाते. भवानी फोडली कि नाही ? या विषयावर इथे चूर्ण चर्चा झडवल्या जात आहेत. यात अभ्यासू चर्चा नाहीच. तुम्ही वाघनखं वापरली होती, हि क्लुप्ती तुम्ही लढवली होती पण अफजलच्या दोन तळ मागे येत असलेला रुस्तम-ए-जमालने तुम्हांला वाघनख दिले असे सांगितले जात आहे आणि ह्यामध्ये ती घाण संघटना आघाडीवर आहे. तुम्ही अफजल मारल्याने हुरळून गेला नाहीत तर तडक पन्हाळा आणि कोल्हापूर स्वराज्यात आणले. स्वराज्याची सीमा दक्षिणेत वाढवली पण आज आम्ही ह्याचा आदर्श घेतलेला नाही कारण आज काहीही होवो इथे समारंभ आयोजित केले जातात. अहो बुलेटवर इथे रॅली काढली जाते. “फुल्ल धुराळा” असं काहीतरी वर्णन करून गाव उंढारलं जात. अरे हो आणि बाजारात, बुलेट चालवणाऱ्याची एखादी मैत्रीण समोर असेल तर बघायलाच नको त्याची शायनिंग ! मग तुम्ही मनांत सुद्धा नसतात. तुमच्याकाळी कोणतीच गाडी नव्हती पण आज स्वराज्याची निशाणी बुलेट आहे. कठीण होत चालली आहे परिस्थिती कारण इथे तुमच्या युद्धाचा अभ्यास करणारी कमी आणि भक्त मंडळी वाढलेली आहे. आज तुम्ही आम्हांला धर्माचा अभिमान शिकवला आणि यश कसे मिळवायचे याचे तंत्र समजावले. आतातायीपणा न करता शांत राहून, विचार करून मार्ग कसा काढायचा, हे सांगितले पण आज आमच्यात फार कमी लोक आहेत जे तुमच्या विचारांवर चालतात. अरे हो एक सांगायचे राहिले ढोल-ताशा पथक आणि स्वराज्य याच काही नातं होतं का ? नेहमी प्रमाणे माझा भाबडा प्रश्न ! कारण आज ढोल वाजवणाऱ्या मुलाच्या हातावर क्षत्रियकुलावतंश कोरलेलेच असते त्याच बरोबर कपाळी चंद्रकोर आणि कानी डूल आहे, निमुळती दाढी यातून माहित नाही, नक्की ह्या मध्ये काय दर्शवायचे आहे ते ? पण एक नक्की, बुद्धिभेद होतो आहे. राजकीय माणसे तुमचं कार्ड वापरतात आणि अशी टॅटूवाली लोक तुम्हांला style icon बनवत आहेत. ते मनाला पटत नाही ओ माझ्या ! आणि चिडचिड होत राहते.
हिंदवी स्वराज्य टिकवायला जीवाचं रान केलं होत मावळ्यांनी ! इथे हिंदूंमध्येच जातिभेद करण्यासाठी रान केले जात आहे. भगव्याचे आम्ही पाईक आहोत पण आज ती एका पक्षाची निशाणी आहे. घरावर लावला तर त्या पक्षाचा शिक्का आमच्यावर मारला जातो. पुरोगामीच्या नावाखाली इथे हिंदूला पिछाडीवर लोटलं जात आहे आणि हे करणारे आपलेच आहेत याचे जास्त दुःख आहे. तुम्ही मारलेला तो अफजल कबरीत तडफडत आहेच पण इथे आपल्या समाजात त्याचा जास्त वावर वाढला आहे, हे हि विसरता येणार नाही. त्याची कबर आज “वाढता वाढता वाढे” अशी आहे आणि आपला प्रताप पाहणारा तो गड इंच इंच ढासळत आहे. त्याचे मुंडक मेख मारून राजगडाकडे पाठवले होते, कसा असेल तो सोहळा ? हे आठवताना अंगावर शहारे येतात पण आज याचा विसर पडला आहे. तुटपुंज्या मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्व बाजारात विकलं जात आहे, ह्याची खंत आहे.
महाराज, तुम्ही अफजल फाडला कारण तो हिंदवी स्वराज्यावर चालून आलेला होता. तुम्ही नसतात तर आज धर्म वाचला नसता, हे सत्य आहे पण एकदंरीत आज हिंदुत्ववादी गोष्टी इथे रुचत नाहीत आणि साहजिकच बुद्धिभेदाचे पीक अमाप येत आहे. आम्हांला तुमची आठवण येतेच पण समर्थ म्हणतात ना, "अखंड सावधान असावे", ते सुद्धा आठवत राहते, महाराज थांबतो.
मंडळी ! लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
No comments:
Post a Comment