प्राचीन भारतातील भावलेले दोन चिनी प्रवासी....

          

          मागील काही महिने प्राचीन भारतावर अभ्यास सुरु आहे. विविध ग्रंथ आणि प्रवासवर्णन वाचताना बऱ्याच देशांमधून काही प्रवासी आपल्या भारतात आले आणि त्यांनी आपल्या भारतातील रूढी, परंपरा आणि येथील राजसत्ता तसेच आक्रमकता ह्यांविषयी सविस्तर अशा नोंदी केल्या. त्यामध्ये दोन प्रवासी मला जरा जास्तच भावले पहिला फाहियान आणि दुसरा युअन् च्वांग ! कारण त्यांनी आपल्या देशाविषयी भरभरून लिहिले आहे. 


          लांबच लांब वर्षानुवर्षे केलेला प्रवास त्यात त्यांना आलेले अनुभव, त्यांचा राजाश्रय, येथील राजांनी त्यांची घेतलेली दखल, हे सर्व पाहताना फक्त प्रवासी मंडळींसाठी तरी "अतिथी देवो भव:" हि संकल्पना दृढ होत जाते. विविध प्रांत फिरत असताना त्यांचे अनुभवसुद्धा वेगवेगळे आहेत, जे वाचताना बऱ्याच गोष्टी नव्याने आपल्याला समजतात. भारत फक्त देश नाही तर सर्वांना सामावून घेणारे राष्ट्र आहे. हाss... आता काही जणांनी ह्याचा गैरफायदा घेतला हि, गोष्ट निराळी ! पण एकंदरीत असे मत, ह्यांचे प्रवासवर्णन वाचताना होते. कठीण परिस्थिती आपला देश कसा झुंजला ह्यावर ह्या प्रवाश्यांनी मतं नोंदवली आहेत. आपल्या देशाची खासियत म्हणजे इथे येणारे परकीय मंडळी त्याकाळी आणि आता सुद्धा ह्या भूमीच्या प्रेमात पडतात. इथे मी "शत्रूवर प्रेम करा" असे नक्कीच म्हणणार नाही, कारण मुळांतच हा सुविचार मला गाढवपणा वाटतो. असो !


          मला ह्या ब्लॉगमध्ये दोन प्रवाशांची ओळख करून द्यायची आहे. जे लोक प्राचीन इतिहासाचा अभ्यास करत आहेत त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होईल. तर बाकी काही वाचक मंडळी आहे ज्यांना हि नवीन माहिती "हटके" तर वाटेलच परंतु बऱ्याच गोष्टी नव्याने समजून येतील आणि चर्चेत ह्या विषयांना स्थान प्राप्त होईल.



          तर पहिला जो प्रवासी आपण पाहणार आहोत तो  म्हणजे फाहियान ! (वरील फोटोत फाहियान आहे कि नाही ? याबाबत साशंकता आहे.) असो ! ह्याच्या अनुभवांची मदत आपल्याला वेळोवेळी होत आहे तसेच बऱ्याच लोकांना हा माहितीसुद्धा नाही. ह्याचाच आदर्श ठेवून युअन् च्वांग इथे आला आणि प्रचंड प्रसिद्धी आणि बऱ्याच वस्तू घेऊन गेला. त्यामुळे पहिले फाहियानला भेटू आणि त्यानंतर त्या च्वांगला भेटूया.


          फाहियान हा इस ३९९ च्या सुमारास भूमार्गाने गंधारला म्हणजे आताच्या कंदाहार आला. तिथून तो भारतात प्रवेशला. हा भारतात आलेला पहिला चिनी प्रवासी आहे. एकूण त्याची सहा वर्ष प्रवासात गेली. आपल्या देशातील अनेक ठिकाणी त्याने वास्तव्य करून आपल्यातील बऱ्याच घटनांची माहिती त्याने सविस्तर लिहून ठेवली. हा बौद्धधर्मी भिक्षू होता. त्याच्या नावाची फोड करायची झाली तर "फा" म्हणजे धर्म व "हियान" म्हणजे आचार्य अशी होते. 


त्याचा इथे येण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे बौद्धांच्या पवित्र स्थळांची यात्रा, पवित्र अवशेषांचे दर्शन व बौद्ध धर्मावरील हस्तलिखिते गोळा करून चीनमध्ये न्यावी हा होता. 
फाहियान संस्कृत भाषेच्या अध्यापनासाठी पाटलिपुत्र म्हणजे आताच्या बिहार राज्यातील पाटणा इथे तीन वर्ष राहिला. त्यावेळी अशोकाचा राजवाडा पाहून तो थक्क झाला. काय असेल स्थापत्य श्रीमंती ! ह्याचा विचार करून पहा. त्याने मगधमधील लोकांविषयी नोंद केली ती म्हणजे, "ते लोक श्रीमंत व सुखवस्तू होते. दानशीलता व गुणशीलता ह्यावर इथे स्पर्धा चाले." कमाल आहे ना ! त्याची सफर पूर्ण झाली तेव्हा तो म्हणतो, "अखंड प्रदेशात हिंदू धर्माचेच वर्चस्व व भरभराट होत आहे", हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे वाक्य ! 


          फाहियान बारा वर्ष भारतात तर त्यातील सहा वर्ष तो प्रवासात होता पण त्याला कुठेही चोर-लुटारूंचा त्रास झाला नाही. त्याने गंधारपासून ताम्रलिप्ती बंदरापर्यंत व कोसलपासून गयेपर्यंत प्रवास केला. इस ४१४ मध्ये ताम्रलिप्ती या बंदरातून सिलोन - जावा या मार्गाने चीनला परतला. तिथे गेल्यावर घेतलेल्या नोंदींवरून त्याने प्रवासवृत्तांत लिहून काढला, त्या दस्तावेजाचे नाव Fo-Kwo-Ki म्हणजे "बौद्ध राज्यांचे वर्णन" असे आहे. अशा भल्या मोठ्या ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर सॅम्युअल बील, डॉ. लेगे आणि एच. गाईल्स यांनी केले. तर असा हा फाहियान आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासताना महत्वाचा ठरतो.


          चला तर आता भेटूया इतिहासातील प्रसिद्ध अशा यात्रेकरूला ! त्याच्या प्रवासवर्णनाला अतिशय महत्व आहे. बऱ्याच जणांच्या ओठी त्याचे नाव आहे. बौद्ध तत्वज्ञानाचा त्याच्या आयुष्यावर दुरगामी परिणाम झाला होता. हो ! हो ! तो म्हणजे युअन् च्वांग....

 

 



          युअन् च्वांगचा जन्म हो-नान प्रातांत चिन-लिऊ येथे इस ६०३ मध्ये झाला. त्याच्या चार भावांपैकी हा सर्वांत लहान होता. क्रमांक दोनच्या भावाने ह्याला चीनच्या पूर्वेकडील लो-यांग ह्या राजधानीत नेले आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. २०व्या वर्षी हा अधिकृत बौद्ध भिक्षु झाला आणि त्याला बौद्ध साहित्याची प्रचंड आवड निर्माण झाली. अशातच त्याला फाहियान म्हणजे ज्याचा आढावा आपण वर घेतला तो ! त्याच्या साहित्याची गोडी निर्माण झाली आणि जिज्ञासू युअन् च्वांग इतिहासात रमायला लागला. बघा, श्रद्धेला इतिहासाची जोड मिळाली तर श्रद्धा अजून दृढ होत जाते ती अशी ! युअन् च्वांग आता वाचनवेडा झाला होता. फाहियान भारताविषयी भरभरून लिहितो, ह्याचाच परिणाम च्वांगवर झाला आणि पश्चिमेकडे म्हणजे भारतात जाऊन अध्ययन करायचे त्याने ठरवले.


          इस ६२९ युअन् च्वांग चीनच्या बाहेर पडला, अनेक प्रदेश तुडवीत बिकट परिस्थितीला तोंड देत तो ताश्कंद, समरकंद, बल्ख आणि गंधारमार्गे तो भारतात पोहचला. काश्मिरात काही दिवस राहिल्यावर तो मथुरा आणि स्थानेश्वर म्हणजे आताच्या बिहारमधील ठाणेसर  इथे पोहचला. त्यावेळी वर्धन घराण्याची राजसत्ता तिथे होती. इतिहासात पराक्रमी व दिलदार असा हर्षवर्धन राजा तिथे राज्य करत होता. ह्या राजाची कीर्ती इतकी जबरदस्त होती कि, आजही त्याच्या काळाला "हर्षकालीन भारत" असे म्हणतात.


           वर्धन राजा हर्षने त्याचे जंगी स्वागत केले, त्याच्यासाठी खास कनोज येथे धर्मपरिषद भरवण्यात आली आणि त्यात ह्याला मानाचे स्थान देण्यात आले. या नंतर तो प्रयाग, कौशांबी, अयोध्या, श्रावस्ती, कुशीनगर, कपिलवस्तू, पाटलिपुत्र, गया इ. ठिकाणी तो गेला. बौद्धांच्या पवित्र वास्तूंचे दर्शन घेऊन तो नालंदा येथे दोन वर्ष राहिला होता. संस्कृत आणि बौद्ध तत्वज्ञानाचे त्याने अध्ययन केले आणि तो दक्षिणेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आला. त्यावेळेस इथे बदामीच्या चालुक्यांचे राज्य होते आणि दुसरा पुलकेशी इथे राज्य करत होता.


          युअन् च्वांगने हर्ष राजाच्या बाबतीत खूप नोंदी केल्या ज्या आज अभ्यासासाठी महत्वाच्या आहेत. यमुनेजवळ झालेले पुलकेशी आणि हर्षचे युद्ध आणि त्यात झालेली हर्षची हार त्याने लिहून ठेवलेली आहे. हर्ष हा दिलदार होता आणि शेवटच्या पाच वर्षात त्याने सर्व संपत्ती दान केली, असेही म्हटले आहे.

           युअन् च्वांग हा आपल्या महाराष्ट्रात आला आणि त्याने केलेली नोंद म्हणजे, "मराठे स्वाभिमानी आहेत, शूर आहेत. शत्रूला कल्पना देऊन सावध करतात व मग सूड उगवतात. उपकारकर्त्याबद्दल कृतज्ञ असतात. आपल्याला दुखविणाऱ्याचा, अपमान करणाऱ्याचा, जीव धोक्यात घालूनही बदला घेतात. शरणागताला प्राणपणाने सहाय्य करतात."


पहा ह्यालाच म्हणतात मराठ्यांचा स्वाभिमान ! ज्याच्या प्रेमात युअन् च्वांगसुद्धा पडला.


          युअन् च्वांगने भारताला "ब्राम्हणांचा देश" असे म्हटले आहे. इथे अनेक उपपंथ आहेत. बौद्ध धर्मियांची संख्या इथे रोडावत चाललेली आहे. देवांची (बहुतेक शिवाची) त्याने २०० देवळे पाहिली होती, अशी नोंदही त्याने केलेली आहे. अजिंठा लेणी पाहून त्याविषयी खूप जबरदस्त असे लिखाण त्याने केले. पुढे सौराष्ट्र, सिंध, काबुल, गझनी, काश्गन, खोतानमार्गे इस ६४५ मध्ये तो चीनला परतला. बऱ्याच वस्तू तो आपल्या बरोबर घेऊन गेला. त्याची नोंद त्याने केली आणि त्याचे भाषांतर सॅम्युअल बिलकृत ह्यांनी केले. त्यातील पहिल्या खंडात ती यादी आली आहे, जी मी खाली देत आहे. 

 

१) तथागताच्या पार्थिव देहाचे अवशेष ५०० रती वजन इतकं नेले.
२) पारदर्शक अधिष्ठावरील बुद्धाची सुवर्णप्रतिमा !
३) कौशंबीचा राजा उदयनने तयार केलेली चंदनाची प्रतिकृती आणि रौप्यप्रतिमा !
४) महायान पंथाचे १२० सूत्रग्रंथ.
५) ५२० निवड ग्रंथ जे न्यायला २२ घोडे लागले. 


          चीनमध्ये पोहचल्यावर ह्या सर्व ग्रंथांचे त्याने भाषांतर केले आणि वयाच्या ६१व्या वर्षी म्हणजे इस ६६४ मध्ये तो मृत्यू पावला. भारतात एकूण १४ वर्ष वास्तव्य करून आज त्याने केलेल्या नोंदी आमच्या सारख्या अभ्यासकांना मार्गदर्शनपर ठरत आहेत. 


          तर असे हे मला भावलेले दोन चिनी आपण पाहिले. इथे नेमकं मला एक आठवतं, ते म्हणजे त्याकाळी ह्यांनी आमच्या quality वस्तू नेल्या आणि आज आम्हांला बऱ्याच वस्तू त्यांच्याच देशातून येतात ज्यांचा दर्जा आपणांस माहित आहेच. 


असो ! काळाचा महिमा बाकी काय..........?


          लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.


          लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.


© सागर माधुरी मधुकर सुर्वे

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@sagar7960