भारतीय सैन्यातील श्री सतिश शिंदे सरांशी फेसबुकवर ओळख झाली तेव्हापासून त्यांच्या श्रीमत रायगडवर लिहिलेल्या पोस्ट मी नेहमी वाचत असे आणि माझ्या पोस्ट ते वाचत असत. हि ओळख like आणि comment पुरतीच मर्यादित होती पण मला एक नक्की जाणवायचे कि, ह्या माणसाचा श्रीमत रायगडचा अभ्यास अगाध आहे. आजही ह्या अवलियाला डोळ्यांना पट्टी बांधून किल्ला फिरवला तरी ऐतिहासिक सुगंधावरून इत्नभूत माहिती देऊ शकतील. पुढे ह्यांनी बा रायगड असा whatsapp समूह काढला आणि मला त्यात सामील करून घेतले. मी तसा माझा स्वतःचा समूह सोडला तर बाकी समूहात अजिबात active नसतो ! पण हा समूह वेगळा होता, श्रीमत रायगडावर ह्या मध्ये ससंदर्भ चर्चा होत असे जी माझ्या सारख्याला उपयुक्त ठरत असे. बरेच महिने गेले आणि "बा रायगड" नावाचा पहिला विशेषांक प्रकाशित झाला पण काही वैयक्तिक कारणांमुळे मला त्यामध्ये भाग घेता आला नाही व त्यानंतर १ वर्ष गेले आणि दुसऱ्या अंकाची लगबग सुरु झाली. सतीश दादांनी मला विचारले, तात्काळ होकार कळवला आणि लेख लिहायला घेतला, पाठवला आणि सरते शेवटी छापून या वर्षीच्या विशेषांकात तो झळकला. सांगण्याचा मुद्दा हा कि, जी process तब्बल एक वर्ष चालली ती एका परिच्छेदात मला मांडावी लागली.
"न भूतो न भविष्यती" असा सोहळा श्रीमद रायगडावर पार पडला. मी विशेषांकात लिहिलेला हा पहिलाच लेख ! या आधी तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स आणि गोवन वार्ता अशा वृत्तपत्रांमध्ये लघु व दिर्घ लेखन सुरु असते पण विशेषांकात प्रकरण आणि ते हि, लोकांना आवडेल असे लिहायचे म्हणजे हे माझ्यासाठी आवाहन होते जे यशस्वीररित्या पार पडले कारण आता वाचकांची प्रतिक्रिया येत आहेतच आणि अद्याप एकही नकारात्मक प्रतिक्रिया आलेली नाही म्हणून या विषयावर ब्लॉग उशिरा लिहायला घेतला. अगदी अनोळखी लोकं सुद्धा तुम्हांला हे सर्व करायला वेळ कसा मिळतो ? असा सोपा पण विचारताना मात्र यक्ष प्रश्नासारखा विचारतात. असो ! वेळेचे योग्य नियोजन केले तर भरपूर वेळ मिळतो.
या विशेषांक सोहळ्यासाठी मी आई आणि वडिलांना घेऊन गेलो होतो. सकाळी साधारणतः नऊ वाजता आम्ही घरातून निघालो आणि दुपारी बा रायगड या समूहात ओळख झालेला आणि अफाट शब्दसंग्रह असलेला अवलिया म्हणजे मोहन फराडे ! त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून श्रीमद रायगडाकडे प्रस्थान केले. इंदापूरहुन डाव्या बाजूला गेलेल्या ऐतिहासिक पाळंमुळं असलेल्या रस्त्यावरून आम्ही निघालो. अफाट सौंदर्याने नटलेला सह्याद्रीतून गाडी चालवणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो. जोरदार पाऊस नुकताच पडून गेला होता त्यामुळे रस्त्यांवर बऱ्याच प्रमाणात परतीच्या पावसाला "बाय-बाय" करायला खेकडे, लाहुरी असे तत्सम प्राणी व पक्षी आले होते. कसरत करत त्यांचा जीव वाचवत मी कार चालवत होतो. अल्याडपल्याड करत पाठशिवणीच्या खेळासारखा श्रीमत रायगड खुणावत होता. तो ऐतिहासिक मार्ग संपला आणि पोहचलो थेट रोप वे स्टेशनजवळ !
पावसाने आता आमचे स्वागत करायचा चंगच बांधला होता. बुकिंग संबंधी काही formality पूर्ण करत असताना, समोर पाहतो तर काय ! डॉ. सदाशिव शिवदे आणि डॉ. पराग लिमये हि इतिहासतज्ञांची जोडगोळी, आहाहा ! दोन इतिहासतज्ञ एकाच ठिकाणी, दुधात साखर कि ओ ! लागलीच बॅगेतून जज्वलनतेजस संभाजीराजा पुस्तक काढले आणि शिवदे सरांची त्यांच्याच पुस्तकावर सही घेतली आणि पळत पळत रोप वे मध्ये जाऊन बसलो. खास ते पुस्तक त्यांच्या सहीसाठी घेऊन गेलो होतो, पहिल्या पायरीची स्वप्नपूर्ती झाली आणि सुरु झाला तो झुलता पाळणा श्रीमद रायगडच्या दिशेने ! पायऱ्या चढून जाण्यात जे थ्रिल आहे ना, ते नाही इथे ! इथे आहे फक्त भीती जीवाची, बस्.... काहीही म्हणा, इतिहास पायऱ्यांवर कोरलेला आहे. असो ! रोप वे आता सुरु झाला होता आणि जवळ जवळ अर्धे अंतर कापले न कापले तोच, वीजकल्लोळ उठला, प्रचंड गडगडात झाला आणि मनात चर्र झाले काही काळ हृदय थांबले. रोप वे मात्र निर्भीड होता श्रीमद रायगडासारखा ! शेवटी जवळ राहून त्याला श्रीमदचा गुण लागलाच होता. आम्ही मात्र फार घाबरलो. काही मिनिटांचा तो प्रवास आता जीवघेणा वाटत होता. कधी एकदा गडावर पोहचतो असे झाले होते. एकदाचे पोहचलो आणि रूमवर पोहचतो तो ना पोहचतो तोच प्रचंड पाऊस सुरु झाला. अफाट रायगड आता न्हाहून निघत होता. कडाडणाऱ्या वीजा आता थंडावल्या होता कारण आम्ही श्रीमद रायगडच्या कुशीत होतो. अहो ! बा रायगडचा धाक आहेच मुळात असा ! कोणताही कठीण प्रसंग असो, रायगड स्फूर्तीदायक आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे आज तो सर्वोच्च ठरत आहे. जर मनापासून तुम्ही रायगडवारी केलीत तर छत्रपतींचा वावर तुम्हांला नक्की जाणवेल. अर्थात त्यासाठी ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन अत्यंत महत्वाचे आहे.
रूमवर विश्रांती घेत होतो आणि काही वेळांतच शिवदे सर रोप वे मधून वर आले. व्वा ! बाजूच्या खोलीत त्यांची व्यवस्था केली होती. तब्बल दोन तास आम्ही गप्पा मारल्या. छत्रपती संभाजी महाराजांकडे ते कसे वळले इथं पासून तर नोकरी निमित्त कुठे कुठे फिरले आणि विविध पुस्तकांचा प्रवास ते उलगडत होते. अगदी माझ्या आयुष्यातील हा एक अविस्मरणीय क्षण मी उपभोगत होतो. पाऊस आता थांबला होता. संपूर्ण श्रीमत रायगड न्हाऊन निघाला होता जणू काही त्याचे अंग पुसायला ढग त्याच्या कुशीत हळुवारपणे शिरत होते. बरोबर संध्याकाळचे सहा वाजले होते सर्वच सभासद छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेत न भूतो न भविष्यती सोहळ्यासाठी जमले. स्थितप्रज्ञ शिवराय सिहासनारूढ होते. सर्व प्रथम छत्रपतींना मानवंदना झाली. दुमदुमली राजसदर छत्रपतींच्या जयघोषाने ! इशरतीची तोफ ठासली गेली. छत्रपतींच्या आदेशाने तोफेला बत्ती दिली आणि बार उडवून दिला, आसमंतात ! उधळला भगवा रंग चहू दिशांना आणि ह्याच इशरतीवर गडाचा दरवाजा बंद झाला कारण उन्हाळ्यात सूर्यनारायणाचे दर्शन होते परंतु पावसाळ्यात मात्र ह्या खुणेसाठी इशरतीच्या तोफा सायंकाळी उडवल्या जात असत.
स्थितप्रज्ञ शिवराय राजसदरेत होते. बा रायगडाच्या सभासदांनी फुलून गेला होती ती सदर ! डॉ. सदाशिव शिवदे सर, डॉ. पराग लिमये, अरुण पाटील, संजय करपे अशी सर्व दिग्गज इतिहासतज्ञ मंडळी आणि माझे वडील ह्या सर्वांच्या हस्ते बा रायगडवारी विशेषांकाचे प्रकाशन झाले. जय जयकार झाला छत्रपतींचा, राज्याभिषेकाची ती लगबग झरकन डोळ्यांसमोर तरारळी. ज्या वास्तूने राज्याभिषेक पाहिला आज त्याच वास्तूत हा सोहळा रंगला. भाग्य तर आमचे खासच होते. पहिल्यांदाच मी विशेषांकात लिहिले आणि त्याच अंकाचे प्रदर्शन राजसदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समक्ष होणे, बस् अजून काय ! प्रकाशन पार पडले आणि विजांचा कडकडाट झाला. पावसाची रिमझिम सुरु झाली. देव, देश आणि हिंदू धर्म वाचवणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या दरबारात थेट आसमंतातील देवाच्या दरबारातून देवांनी हा सोहळा अनुभवला आणि आशिर्वादरुपी पावसाच्या सरीवर सरी पाठवल्या, त्याची हि जणू काही पावतीच !
सोहळा पार पडला होता आणि आता वेळ होती, शिवदे सरांच्या व्याख्यानाची ! छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, नमस्कार केला आणि धर्मशाळेत निघालो. अगाध, अफाट आणि आक्रमक संभाजी महाराज मांडताना मंत्रमुग्ध झाला होता तो परिसर आणि बा रायगडचे सभासद ! पावसाची रिमझिम सुरुच होती पण आम्ही मात्र व्याख्यानाच्या शब्दारुपी डोहात डुंबत होतो. projector वर शंभुराजांविषयी एक एक slide पाहताना मन भरून आले होते. तब्बल दीड तास व्याख्यानाचा आनंद आम्ही घेतला आणि नंतर आई, मी आणि वडील निघालो थेट रूमवर ! आता मात्र श्रीमत रायगडाने वेगळाच साक्षात्कार घडवला. रात्रीचे नऊ वाजले होते. मोबाईलच्या फ्लॅशच्या प्रकाशात आम्ही जपून पावले टाकत होतो. भवानी टोकाच्या पलीकडे पाऊस दूर लपून बसला होता. संपूर्ण श्रीमत धुक्यात हरवला होता, वातावरण भारले होते त्या अदृश्य शक्तीने ! जपून पावले टाकत आम्ही होळीच्या माळावर पोहचलो. नजर मारली आणि थोडं फार ते वातावरण अनुभवले. सर्रकन काटा अंगावर आला आणि ती प्रचंड शांतता आता मनाला भावली. पावसाने पुन्हा हळुवार डोकं वर काढलं. आम्ही तिघंही आता नगारखान्यातून आत आलो. स्थितप्रज्ञ शिवराय आणि त्यांच्या समोर शांतपणे तेवत असणारी ती मंद प्रकाश देणारी निरंजनाची वात उजळून गेला होता तो पवित्र परिसर ! ती राजसदर आता मात्र लोकांनी जरी रिकामी झाली असली तरी माझ्या आठवणींनी भरून गेली होती. पुन्हा एकदा त्या राजसदरेत मी वंदन केले आणि छत्रपती शिवरायांनी स्मितहास्य केले. काही क्षणांतच वेगवेगळे प्रसंग एका मागून एक मला डोळ्यांसमोर दिसायला लागले. तो मुजरा मारणार हेन्री ऑक्झिडेन, ती रात्र रात्र जागून गडावर चालणारी खलंबत ! छत्रपती संभाजी महाराजांचा वावर, जिजामातांचा तो थरथरणारा प्रेमळ आवाज ! गर्दी झाली होती आठवणींची ! एकटक छत्रपती शिवाजी महाराजांकडे मी पाहत त्या राजसदरेच्या मागे गेलो. सचिवालय आणि छत्रपतींच्या निवासस्थानातून जाताना ते अवशेष पाहून डोळे पाणावले होते, पुढे राणीवसाची वास्तू आणि मेणा दरवाजातून बाहेर पडलो. त्या जीवघेणा पोटल्याच्या डोंगरावरून ढगांची येजा सुरु होती. पावसाने आता जोर धरला होता आणि आम्ही रूमवर विसावलो. बाजूचे हॉटेल आणि रोप वे आता शांत झोपी गेले होते. मस्त जेवणावर ताव मारला आणि बा रायगडवारी विशेषांक चाळत बसलो.
श्रीमत रायगड जागता होता. पलंगावर पडून बराच वेळ मी स्थितप्रज्ञ छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजसदरेतील मूर्ती आठवत राहिलो. काही केल्या आठवणी मागे पडत नव्हत्या आणि मी मात्र मनाने अजूनही त्या पवित्र राजसदरेत रुळलो होतो.
दुसरा दिवस उजाडला आणि रायगड फिरून वाडेश्वर महादेवाच्या दर्शनाला गेलो, हो हो तोच ज्याला तुम्ही जगदीश्वर समजता ! तो पर्यंत बा रायगडाचे सभासद भवानी टोकाकडे गेले होते आणि आम्ही तिघंही वाडेश्वराच्या दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नसताना त्या मंदिराचे दर्शन घेणे, त्या गाभाऱ्यातील शांतता अनुभवणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो. एकाग्र होऊन त्या रंगशिलेवर थोड्यावेळ शांत बसलो आणि कवी भूषणांची आठवण झाली. ह्याच प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांची ती पहिली ऐतिहासिक भेट आठवली. इथेच "इंद्र जिमी जंभ पर...." जगप्रसिद्ध काव्य गायले गेले. अशा असंख्य आठवणीत तो श्रीमत रायगड पाहताना वर्षभराची स्फूर्ती मिळाली आणि नेहमीप्रमाणे जड अंतःकरणाने मी निघालो परतीच्या प्रवासाला ! हा असा श्रीमत रायगड म्हणजे देव, देश आणि धर्म वाचवणाऱ्या राजाच्या तख्ताची जागा !
पुन्हा एकवार मुजरा राजे मुजरा....
बा रायगडवारी विशेषांक अतिशय सुरेख लेखनशैलीत घडवलेला असून संग्रही ठेवावा असा आहे. ह्या मध्ये श्रीमत रायगडसंबंधी ससंदर्भ असे खोलवर लिहिलेले लेख असून इतिहास अभ्यासक तसेच वाचनवेड्यांसाठी अविस्मरणीय पर्वणी ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.
जर कोणाला हा विशेषांक हवा असल्यास ओंमकार कारागीर ह्यांच्याशी +९१ ८३९०५८८८४५ ह्या क्रमांकावर संपर्क करावा.
श्रीमत रायगडावरील काही अविस्मरणीय क्षण....
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज..
व्याडेश्वर मंदिरावरील शिलालेख या मध्येच रायगडचा उल्लेख श्रीमद आहे म्हणूनच या गडाचा उल्लेख करताना "श्रीमद रायगड" असा करावा.
लेख कसा वाटला ते comment box मध्ये अथवा sagarblog4@gmail.com वर मेल स्वरूपात नक्की कळवा.
लेखाचे संपूर्ण हक्क राखीव ठेवण्यात आले असून लेखकाच्या पूर्वपरवानगीनुसार लेख कॉपी करू नये, असे आढळल्यास कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल.
© सागर माधुरी मधुकर सुर्वे
नशीबवान आहेस, आठवणींचं गाठोडं शब्दांत छान बांधुन ठेवतोस तु,कधीही भुक लागली कि शांत बसुन गाठोड्यातुन एक एक आठवण काढुन मनसोक्त ताव मारून पुन्हा मार्गस्थ व्हावे....
ReplyDelete